माणगाव: ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यालयच आले पाण्याखाली!
'त्या' विभागालाच आता पाण्याची धास्ती; प्रशासन कधी जागे होणार?

पुरार ( प्रतिनिधी – रिजवान मुकादम ) माणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासकीय ढिम्म कारभाराचे जाहीर वाभाडे निघाले आहेत. संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ‘ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता’ कार्यालयासमोरच आता मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पाण्याच्या निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने, संपूर्ण कार्यालय परिसराने अक्षरशः एका मोठ्या तलावाचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे “दुसऱ्यांची तहान भागवणारं कार्यालयच आज पाण्यात बुडालंय, आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
🌊 कार्यालयात शिरले पाणी; दैनंदिन कामकाज ठप्प!
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही गटार व्यवस्था नसल्याने साचलेले पाणी आता थेट कार्यालयाच्या आतील भागात शिरले आहे. यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर प्रचंड विपरीत परिणाम झाला आहे. कार्यालयात कामासाठी येणारे नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साचलेल्या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. सर्वात मोठी भीती म्हणजे, कार्यालयातील अत्यंत महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फाईल्स, साहित्य आणि इतर कार्यालयीन वस्तू भिजून त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
🦟 आरोग्याचा गंभीर धोका; नगरपंचायत सुस्त?
कार्यालय परिसरात साचलेल्या या सांडपाण्यामुळे आणि पावसाच्या साचलेल्या साठ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयाचीच जर ही दुरवस्था असेल, तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न पुरार आणि माणगाव परिसरातील जनता विचारत आहे.
📢 नागरिकांची आक्रमक मागणी:
१. नगरपंचायत माणगाव आणि आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी उपसण्याची व्यवस्था करावी. २. कार्यालय परिसरात जंतुनाशक फवारणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ३. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, या पाण्याच्या निचऱ्यासाठी नगरपंचायतीने कायमस्वरूपी ड्रेनेज लाईन (उपाययोजना ) तयार करावी.
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे नगरपंचायत आणि संबंधित यंत्रणा अजून किती काळ जाणीवपूर्वक डोळेझाक करणार? एखादे मोठे नुकसान किंवा आरोग्याची आणीबाणी निर्माण होण्याची वाट पाहिली जात आहे का? याकडे आता संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.



